35.1 C
Pune
Monday, April 29, 2024

आकाशवाणीतले आठवणीतले दिवस: भाग १०

सिंहस्थातील दुर्दैवी घटना

Must read

सुनील शिनखेडे
सुनील शिनखेडे
कवी, लेखक, माध्यमस्नेही अशा विविध भूमिका सुनील शिनखेडे हे पार पाडत आहेत . ते सध्या आकाशवाणी सोलापूर केंद्रात सहायक संचालकपदी कार्यरत आहेत . त्यांच्या करिअरची सुरुवात नागपुरात १९८० साली पत्रकारितेतून झाली . त्यांनी कविता संग्रह, ललित लेखन, समीक्षा अशी ५ पुस्तकं प्रकाशित केली . यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी "बातमीची विविध क्षेत्रे" या पुस्तकसंचाचं लेखन त्यांनी केले . गेल्या ३० वर्षात आकाशवाणीसाठी विविध क्षेत्रातील  अनेक मान्यवरांच्या  मुलाखती घेतल्या.

2003 साली नाशिकच्या तीन आणि त्र्यंबकेश्वरच्या तीन अशा सहा शाही पर्वणी आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातल्या श्रोत्यांपर्यंतपोचवल्या. शाही पर्वणींचं हे असं थेट वर्णन आकाशवाणीला आणि श्रोत्यांनाही नवं होतं; परंतु निवेदक, समालोचक आणि तज्ञांचा यातला सहभागअजिबात नवखा नव्हता. पारंपरिक, धार्मिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक  विपुल माहिती देत देत वर्तमानाशी सांगड घातली जात होती. पर्यावरण रक्षण, नदीची स्वच्छता, शहर स्वच्छता, सुरक्षा याबाबत जनतेला सतर्क केलं जात होतं. नाशिक आणि परिसरातील जनतेसाठी वाहतुकी संदर्भातील अपडेट्सदिले जात होते. यासाठी पोलिस यंत्रणेची मदत घेतली जात होती. एकाच वेळी छोट्या नदी पात्रात हजारो भाविक स्नान करत असल्याने पाणीनैसर्गिक, शुद्ध राहत नाही. अशुद्ध पाण्यामुळे साथीचे अनेक रोग, ताप याचा प्रसार वाढतो. त्यापासून सावध करणं, आरोग्य शिबिर, वैद्यकीय सेवायांची उपलब्धता या विषयी माहिती देणं…. हे अधिकृतपणे सांगण्यासाठी पर्वणी काळात आकाशवाणी या माध्यमाचा पुरेपूर उपयोग झाला आणिया माध्यमाची उपयुक्तता पटली.

शाही पर्वणीच्याआधी साधू, त्यांचे आखाडे मिरवणुकीने नदीपात्रात शाही स्नानासाठी येण्याचा प्रघात आहे. त्यांचा क्रम देखील ठरलेला असतो. यामिरवणुकीला शाही मिरवणूक म्हणतात. ती पाहण्यासाठी अलोट गर्दी उसळते. यातले काही आखाड्याचे महंत हत्तीवर चांदीच्या अंबारीतल्या रेशमीगादीवर असतात, काही रथात बसतात, काही घोड्यांवर बसतात, तर काही पायी चालतात. काही ठिकाणी तगडे साधू आपल्या महंतांना खांद्यावरघेऊन नाचतात. सगळ्यांच्या गळ्यांत रंगीबेरंगी फुलांच्या माळा असतात. काही आपल्या जटांमध्ये तुळस खोवतात. काही बेल घालतात. टाळ, झांज, चिपळ्या, ढोल, तुतार्‍या असा नादघोष सुरू असतो. दुतर्फा उभे असलेले लोक फुलं नाणी या मिरवणुकीवर उधळतात.

बहुदा 27 ऑगस्ट 2003 ची नाशिकची शेवटची शाही पर्वणी असावी. पंचवटीत नदीपात्राकडे येणाऱ्या एका उताराच्या रस्त्यावरून चाललेल्या शाहीमिरवणुकीत असेच फुलांसोबत पैसे उधळले जात होते. मिरवणुकीतील गर्दीतले काही लोक प्रसाद म्हणून ते पैसे उचलण्यासाठी खाली वाकले आणिमागून वेगाने धावत येणारे साधू भाविक त्यांच्या अंगावर पडले. चिंचोळ्या रस्त्यावरील हजारोंच्या गर्दीत प्रचंड चेंगराचेंगरी झाली. सकाळीशाहीस्नानापूर्वीच ही दुर्घटना घडली. आमचा कॉमेंटेटर बुथ घटनास्थळापासून जवळच होता. फील्डमध्ये असलेल्या आमच्या प्रतिनिधींना आम्ही सतर्ककेलं. मोबाईलवरून घटनेविषयी लाईव्ह  प्रसारणात माहिती दिली. प्रचंड गोंधळ, पळापळ, रडारड, आक्रंदन यामुळे परिसरातलं वातावरण एकाएकीअशांत झालं. दुर्घटना भीषण होती. सुरवातीला एक- दोन अशी मृतांची आकडेवारी कळत होती. जखमींची तर मोजदादच नव्हती. जिल्हा सामान्यरुग्णालयात डेड बॉडीज, जखमी यांना घेऊन जाण्यासाठी ऍम्ब्युलन्स तिथपर्यंत येणंही शक्य नव्हतं.  पोलीस, जवान, स्वयंसेवक, नागरिक यांनीझोळ्या करून उचलून मुख्य रस्त्यावर ॲम्बुलन्सपर्यंत बॉडीज पोचवल्या. जखमींचीही अशीच रवानगी केली. जिल्हा रुग्णालयात गर्दी वाढली.

आमच्या टीममधील काहींना आम्ही जिल्हा रुग्णालयात पाठवलं. अतिरिक्त जिल्हाधिकारी विलास पाटील परिस्थिती हाताळत होते. दरम्यान शाहीपर्वणी कशीबशी पार पडली. घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त करण्यात आला. आमची थेट प्रसारणाची वेळ संपली होती; परंतु नंतर स्टुडिओतून यादुर्घटनेचा सविस्तर तपशील आम्ही श्रोत्यांपर्यंत पोचवत होतो. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे संध्याकाळपर्यंत या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या 39 वरपोचली. सगळीकडे हाहाकार पसरला. ही घटना नॅशनल, इंटरनॅशनल न्यूज ठरली. मृतांमध्ये बव्हंशी बिहार, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यांतले अनेक भाविक होते. त्यांची ओळख पटवणं, त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेणं, मृतदेह योग्य हाती सोपवणं हे सारे नंतरचेसोपस्कार करण्यासाठी प्रशासन सरसावलं.

प्रसन्न, उत्साही शाही सकाळ एकाएकी मलूल, निस्तेज झाली. नाशिकवर शोककळा पसरली. त्याक्षणी जबाबदार, जागरुक माध्यम म्हणूनआकाशवाणीनं या अनपेक्षित दुःखद, दुर्दैवी घटनेचं वृत्तांकन आणि जनतेला वस्तुस्थितीदर्शक माहिती पुरवण्याचं मोलाचं काम केलं. आमच्याटीममधल्या सर्वांनाच या दुर्घटनेचा जबर धक्का बसला. अनेक जण रुग्णालयात उशिरापर्यंत, दुसऱ्या दिवशीपर्यंत तळ ठोकून होते. टीमचं रूपांतरकार्यकर्त्यांमध्ये झालं होतं. थेट प्रसारणातून मदत कार्यात सहभागी झालेल्या या आमच्या टीमनं सहृदय, संवेदनशील माणुसकीचं दर्शन घडवत…. अनपेक्षितपणे ओढवलेल्या प्रसंगी जबाबदारीनं आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून कसं वागायचं याचा वस्तुपाठच सर्वांसमोर ठेवला.

 

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!
×